• शुक्र. एप्रिल 19th, 2024

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची धुरा कोणाकडे जाणार? 3 नावं चर्चेत

Byनिस्सीम काणेकर

सप्टेंबर 19, 2021

पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण असतील? यावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) रविवारी पुन्हा बैठक होणार आहे.

चंदीगढ : पंजाबमध्ये काल मोठी राजकीय घडामोड घडली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण असतील? यावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) रविवारी पुन्हा बैठक होणार आहे. यावेळी सर्व आमदार सकाळी 11 च्या सुमारास पंजाब भवनात एकत्र येतील आणि एका नावावर एकमताने निर्णय घेतला जाईल. अखेर, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील.

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड़, पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विरोध करणारे सुखजिंदरसिंग रंधावा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. अशा स्थितीत, येत्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेत पक्ष हायकमांड या तीन नावांपैकी कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब करू शकतं.

एका बाजूला सुनील जाखार आहेत, ज्यांना काँग्रेस पक्ष हिंदू मतं आणि जाट शीख मतं मिळवून त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. दुसरीकडे, नवज्योतसिंग सिद्धू आहेत, ज्यांना अलीकडेच पक्ष हायकमांडने मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने त्यांना पंजाबमधून प्रदेशाध्यक्ष केलं आहे. त्याचप्रमाणे, सुखजिंदर सिंग रंधावा हे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे विरोधक मानले गेले आहेत. अशा परिस्थितीत पंजाबची जबाबदारी कोणावर सोपवली जाते हे पाहणं रंजक ठरेल. त्यामुळे सर्वांच्या नजरा रविवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीकडे असतील आणि प्रत्येकजण सोनिया गांधींच्या निर्णयाची वाट पाहत असेल.

राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह पत्रकार परिषदेत म्हणालं, “मी आज सकाळीच निर्णय घेतला होता. हे सोनिया गांधींनाही सांगितलं होतं. हे माझ्याबरोबर तिसऱ्यांदा घडतंय. मला इथे अपमानित वाटत आहे. आता ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे, ते त्याला मुख्यमंत्री बनवतील. मी राजकारणात 52 वर्षे पूर्ण केली आहेत. मी साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री आहे. पण दोन महिन्यांत तीन वेळा भेटून पक्षाने ज्या प्रकारे माझ्यावर दबाव आणला त्यावरून मला अपमानित वाटलं आहे.